सोमवार, १२ ऑक्टोबर, २०१५

"नवरात्र" शंका समाधान - १


नवरात्र म्हणजे काय ? त्याला शारदिय नवरात्र का म्हणतात ?
अश्विन शुध्द प्रतिपदेपासून शरद हृतुचे आगमन होते. प्रतिपदेपासून नवमीपर्यंत साजर्‍या होणार्‍या देवीच्या या उत्सवास शारदीय नवरात्र म्हणतात. ९ दिवस उत्सव चालतो म्हणून नवरात्र. १०व्या दिवशी उत्सवाची समाप्ती होते.
नवरात्र हा वार्षिक महोत्सव असून घरोघरी साजरा होणे आवश्यक आहे. आपण दररोज पूजा करीत असलेल्या कुलदेवतेतील देवत्व अधिकाधिक प्रभावी व्हावे, तिचे आपल्या घरावर व कुटुंबियांवर कृपाछत्र असावे आणि अदृष्य शक्तीपासून तिचे आपल्या कुटुंबाला संरक्षण मिळावे या हेतूने शास्त्रात नवरात्र व्रत सांगितलेले आहे. नवरात्र व्रत जितके आवडीने, भक्तीने, हौसेने व मनःपूर्वक केले जाते, तितक्या अधिक प्रमाणात त्या घरात एकोपा, शांती, सुख व समाधान नांदते.
 नवरात्र हा कुळधर्म कोणी सांभाळावा ? त्यासाठी काय काय करावे ?
नवरात्र महोत्सव हा देवीचा म्हणजे शक्तीउपासनेचा असल्याने अत्यंत महत्त्वाचा कुळधर्म आहे. तो सगळ्यांकडे पाळला जाणे गरजेचे आहे. आपण कुटूंबातून विभक्त झालोत, आपले देव वेगळे केलेत, आपण आपले अन्न स्वतंत्र शिजवितो अशा सर्वांनी हा कुळधर्म पाळावा. आमच्या मोठ्या भावाकडे कुळधर्म आहे असे सोपवून रिकामे राहू नये. स्वयंपाक, मिळकत सगळे वेगळे असताना कुळधर्म कशाला दुसरीकडे सोपवायचा ? ज्या घरात स्वयंपाक व उपजिविकेचे साधन स्वतंत्र, त्या घरात कुळधर्म ही स्वतंत्र असायला हवेत. आपली आपली कुलदेवते आपण सांभाळली पाहिजेत. शिवाय कुळधर्माच्या संस्काराने घरातील मुलांच्या मनात चांगली स्मृती तयार होते. हा संस्कार सांभाळलाच पाहिजे.
कुलदेवतेची प्राणप्रतिष्ठा ती देवता स्थापन करण्याच्या वेळी केलेली असते. ती पुढे दर बारा वर्षांनी करावी. म्हणून तिला प्रत्येक नवरात्रात स्वतंत्र प्राणप्रतिष्ठेची गरज नसते. तिच्यातील चैतन्य कायम टिकविण्यासाठी आपल्या परंपरेने कुलाचाराचे मार्ग सांगितलेले आहेत. नवरात्रात देवीचे घट, चंपाषष्ठीचे नवरात्र यामार्गे सेवा करीत राहिल्यास ते कर्म कुलदैवतेपर्यंत पोहोचते. कुलदेवतेची स्थापना केल्यानंतर काही काळ सेवा खंडीत झाल्यास संरक्षण कवच लगेचच संपत नाही. पण क्षीण होत जाते. त्यामुळे शक्यतो खंड करूच नये. चांगल्या शक्तीचा अनुभव यावा असे वाटत असेल तर परंपरेने चालत आलेले उत्सव साजरे करणे गरजेचे आहे

(क्रमश: पुढील लेखात)

गुरुवार, १ ऑक्टोबर, २०१५

वास्तू दिशा विचार आणि समृद्धी

श्री स्वामी समर्थ 
नमस्कार,

एक दोन खोलीत संसार करणारी सामान्य व्यक्ती वस्तूशास्त्राचे नियम पाळून घर वस्तू सजवू शकत नाही. अशावेळी  दिशांचा विचार करून घरात वस्तूची योग्य प्रकारे मांडणी करता येते. त्यामुळे वस्तू दोष कमी होतो. मनास शांति समाधान लाभते. वास्तूत संपन्नता प्राप्त होते तसेच सुबत्ता नांदते.  घरात मंगल कार्य होतात. घरात आजारपण नष्ठ होते. याच प्रमाणे नवीन घरात प्रवेश करण्या अगोदर देखिल मुहर्त पाहून वस्तू शांतिलाही तेवढेच महत्त्व आहे. हे देखिल आपण लक्षात घेणे आवश्यक आहे. नुसता कलश ठेवून प्रवेश करणे योग्य नाही.  

घरात दिशा प्रथम निश्चीत करून घ्याव्यात. घरातील मांडणी शक्यतो याप्रामाणे असावी.


१.  ईशान्य देशेला देवघर 
२.  पूर्वेला स्नानगृह
३.  अग्नेय दिशेला स्वयंपाक घर
४.  दक्षिण दिशेला झोपण्याची खोली
५.  नैॠत्य दिशेला विळी, सुरु, भांडे ठेवण्याची जागा
६. पश्चिम दिशेला अभ्यासाची खोली, भोजनाची जागा 
७. वायव्य दिशेला भांडार घर धान्य साठवणुकीची जागा  
८.  उत्तर दिशेला तिजोरी कपाट पैशाची जागा 

साधारणत: बैठक ही घराच्या मध्यावर असावी. घरातील झोपण्याच्या पलंगावर बाहेरून येणाऱ्या व्यक्तीस बसवू नये.  घरातील औषधी नेहमी ईशान्य भागात ठेवावी. तशीच ती उंच जागेवर ठेवावी. लहान मुलांच्या हातात पोहचणार नाहीत अशा प्रकारे ठेवावी. 

मुलांच्या अभ्यासाची जागा पूर्वे - ईशान्य, उत्तर दिशेला तोंड करून बसण्याची असावी. विद्या ग्रहण आणि आकलन हे चांगल्या प्रकारे होते. 

घराचे किंवा वस्तूचे प्रमुख प्रवेशद्वार हे मोठे असावे साधारण ४ फूट रुंदीस असावा.  प्रवेशद्वारावर उंबरठा असलाच पाहिजे. प्रवेशद्वारावर श्री गणेश, कलश, स्वस्तिक वगैरे शुभ चिन्हे रेखावीत अथवा चित्र स्वरुपात लावावीत. वाईट प्रवाह, स्पंदने, किंवा लहरी घरात प्रवेश करीत नाही. 

भारतीय संस्कृतीनुसार दारासमोर रांगोळी रेखावी. रांगोळीला हळद कुंक लावावे. शुभ परिणाम होतो. 

एक विशेष सूचना म्हणजे मांगल्याचे प्रतिक घरातील प्रवेशद्वारासमोर तुळशी वृंदावन असावे. वातावरणात प्राणवायूंचे प्रमाण वाढते. 'तुळशीचे महात्म्य' मी पामराने काय सांगावे. 

"तुलसी महात्म्य हे स्त्रियांना सौभाग्यदायक  संतती, संपती देते आणि मानवास भरपूर प्राणवायू देते. वास्तूतील तथा घरातील वातावरण प्रसन्न राहते."
"ॐ नमो भगवते वास्तू देवतायै नम:"

|| शुभमं भवतु ||

आपला 
Preview

बुधवार, ९ सप्टेंबर, २०१५

•|| वास्तु सुख ||•

|| श्री स्वामी समर्थ || 


मित्रांनो कुलधर्म-कुलाचार म्हणजे काय ? कुलधर्म केला नाही तर काय घडते ?
कुळधर्म ज्ञान कुळधर्म सधन । कुळधर्म निधान हाती चढे ।।१।।
कुळधर्म भक्ती कुळधर्म गति । कुळधर्म विश्रांति पाववील ।।२।।
कुळधर्म दया कुळधर्म उपकार । कुळधर्म सार साधनांचे ।।३।।
कुळधर्म महत्व कुळधर्म मान । कुळधर्म पावन परलोकीचे ।।४।।
तुका म्हणे कुळधर्म दावी देवी देव । यथाविध भाव जरी होय ।।५।।
--तुकाराम महाराज.

आप्त संबंधांमुळे जे एकत्र आले आहेत किंवा एकत्र वास करतात असे एका रक्ताचे व संबंधांचे जे काही लोक असतील त्या सर्वांच्या समूहास कुळ असे म्हणतात.कुळ शब्दाला मराठीत घराणे असा शब्द रूढ आहे. कुळ म्हणजे घराणे ठीक आहे परंतु कुळ म्हणजे कुटुंब किंवा जात नव्हे. एका जातीत अनेक कुळे असू शकतात.
कुळधर्म म्हणजे समाज व्यवस्थेतील कर्तव्यांचे पालन करण्यासाठी व समाज व्यवस्था टिकण्यासाठी केलेले अलिखित नियम होय. धर्म या शब्दाचा अर्थ कर्तव्य करणे ते पार पाडणे असाही आहे म्हणून आपआपल्या घराण्यातील परंपरेने चालत आलेले धर्मविधी किंवा चालीरीती पार पाडणे म्हणजेच कुलधार्माचे पालन करणे.
हिंदू धर्मियांमध्ये प्रत्येक कुळाची म्हणजेच घरण्याची काही वैशिष्ठे असतात काही वेगळेपण तर काही साम्य असतात.प्रत्येक घराण्याला स्वतःचे दैवत,स्वतःचे आचार विचार असतात.यामध्ये भौगोलिक रचनेपरत्वे,आर्थिक कुवतीनुसार आदी गोष्टीमुळे बदल घडू शकतात.
कुलधर्म केला नाही तर काय घडते ?
याविषयी श्रीमत्‌भगवत्‌गीतेतील पहिल्या अध्यायात अर्जुनाने सविस्तर वर्णन केलेले आहे.
अधर्म माजतो. वर्णसंकर होतो. (भिन्न व्यवसायामध्ये लग्न होतात.), श्राध्दपक्ष होत नाहीत. त्यामुळे पितरांना तिलोदक मिळत नाही. परिणामी ते प्रेतयोनीमध्ये जातात. तिथे त्यांना असह्य त्रास सहन करावा लागतो. त्यांना मनुष्यजन्म न मिळाल्यामुळे मोक्षाची संधी प्राप्त होत नाही. त्यांचे शाप त्यांच्या वंशजांना लागतात. त्यामुळे अजून अधर्म घडत जातो.
आईवडिल, घरातील वृध्द यांचा अपमान होतो, त्यांची अवहेलना, कुचंबणा होते, त्यांच्याकडे दुर्लक्ष होते, त्यांचे शाप लागतात. कुलदेवतांची, नवग्रहांची, अष्टदिक्पालांची, क्षेत्रदेवतांची, ब्रह्मादीमंडलाची पूजा होणे, त्यांना तूपाची आहूति मिळणे त्यातून त्यांची तृप्ती होणे हे मनुष्य जन्माचे कर्तव्य आहे. ते कुळाचाराद्वारा घडत असते. जरकुलाचार केले नाहीत तर देवतांना त्यांचा हविर्भाग मिळत नाही. या अपदेवता असल्याने त्या नाराज होतात व त्यांचे शाप घराण्याला लागतात.
दीनदुःखी, असहाय्य, पीडीत, वारकरी, साधू-संन्यासी-अतिथी, तडी-तापसी, वैदिक पाठशाळेत शिकणारे बटू, पशुपक्षी विशेषतः गाई यांची सेवा गृहस्थधर्मात करावी असा दंडक आहे. हा धर्म कुलाचार करताना आपोआप होतो. अन्नदान, वस्त्रदान, दक्षिणा, जलपान, आसरा इ. कर्म घडतात. जर कुलाचार केले नाहीत तर समाजातील या घटकांना आसराच राहणार नाही. परिणामी गोहत्या, अतिथीचा अपमान, अवहेलना होते. कर्तव्य न केल्याचे व अधर्म केल्याचे पाप लागते ज्याला कठोर प्रायश्चित्त आहे.

अशा शापित घराण्यामध्ये कोणते अनाचार घडतात ?

भ्रूणहत्या.
अपमृत्यू (अकाली मृत्यू)
दुर्मरण (भाजून, अपघाताने, आत्महत्येने, बुडून, खितपत पडून, खून झाल्याने)
घरात भांडणे होणे,
सुवासिनीला पीडा होणे (डोळ्यात पाणी येणे, अन्न गोड न लागणे, खिन्नता येणे, भीती वाटणे, स्वप्नात साप दिसणे, स्वप्नात अघटित घडताना दिसणे, सतत अस्वस्थता असणे), सवतीचा त्रास होणे (यजमानाचे संसारातले लक्ष उडणे)
घरातून व्यक्ती पळून जाणे (तरणीताठी मुलगी/मुलगा, म्हातारी व्यक्ती, प्रमुख व्यक्ती)
धंद्यात नुकसान होणे. कर्ज होणे, वसुलीसाठी माणसे घरी येणे. कोर्ट कचेर्‍या मागे लागणे
नोकरी जाणे, प्रमोशन न मिळणे, कामात लक्ष न लागणे, कामाच्या ठिकाणी त्रास होणे.
सततची आजारपणे घरात असणे,
लहान मुलांना त्रास होणे (झोपेत ओरडत उठणे, अभ्यासात लक्ष न लागणे)
वाममार्गाला लागणे (परदारा-परधन-परनिंदा)
घरात सतत अशांति असणे.
लग्ने मोडणे, घटस्फोट होणे.
म्हणूनच या बाबत संत ज्ञानेश्वर माउलीनी सर्व जनतेस स्पष्ट संदेश दिला आहे,
कुळीचा कुळधर्म अवश्य पाळावा सर्वथा न करावा अनाचार --ज्ञानेश्वरी
कुळाचा कुळधर्म आवश्य पाळावा कुठेही अनाचार करू नये, कुळाचे नाव सर्वतोपरी उंचावण्याचे कार्य करावे कुलाच्या नावलौकिकाला कोणताही डाग डाग लागणर नाही याची काळजी घ्यावी समाज विघातक कृत्य करू नये.

कुळधर्माचे उपयुक्तता सांगताना संत ज्ञानेश्वर माउली म्हणतात
कुळधर्मु चाळी | विधिनिषेध पाळी | मग सुखे तुज सरळी | दिधली आहे || --ज्ञानेश्वरी
आपला कुलधर्म पाळावा, कुलाचारांचे आचरण करावे तसेच शास्त्रांनी सांगितलेली सत्कर्मे जरूर करावीत व ज्या कर्मांचा निषेध केला आहे ती कर्मे टाळावीत इतके केले म्हणजे सुखाने वागावयास मोकळीक आहे.
वंश परंपरेने आलेले रूढी रिती रिवाज तसेच दैवते यांना कुळधर्मामध्ये अनन्य साधारण महत्व असते.या संदर्भात समर्थ रामदास स्वामीनी ग्रंथराज दासबोध मध्ये सांगितले आहे.
याही वेगळे |कुळधर्म सोडू नये| अनुक्रम उत्तम अथवा मध्यम| करीत जावे || --दासबोध
आपले कुळधर्म आणि कुलाचार जसे परंपरेने चालत आले असतील, तसे सुरु ठेवावेत याशिवाय आपल्या घरी जे कुळधर्म असतील ते जसे चालत आले असतील ते उत्तम किंवा मध्यम असोत आपण ते करीत राहावे.

संधर्भ:  •|| वास्तु सुख 
||

सोमवार, २० जुलै, २०१५

|| श्री स्वामी समर्थ ||
काल दि. १९/०७/१५ रोजी ब्राम्हण वधु-वर परिचय मेळावा औरंगाबाद येथे संपन्न झाला, वधु-वर यादी पुस्तिकाचे प्रकाशन देखिल झाले. या पुस्तकात माझा लेख "पत्रिकेतील मंगळ" हा देखिल आहे तो येथे आपनासमोर मांडत आहे.

पत्रिकेतील मंगळ:

मुलीला मंगळ म्हटले की, पालकांना तिच्या जन्मापासूनच मनात भीती निर्माण होते.  एका विशिष्ठ प्रकारचा त्रास दायक, वैवाहिक जीवनास त्रास देणारा ग्रह डोळ्यासमोर येतो आणि आई-वडिलांची चिंता येथूनच सुरु होते. मंगळ हा पृथ्वीपासून बराच लांब आहे. मानवाने त्यावर स्वारी करून बरीचशी माहिती करून घेतली आहे, नव्हेतर तो तेथे जाऊनच पोहोचला आहे यातही आपला देश अग्रेसर आहे. मंगळ हा अमंगल आहे अशी विचारसरणी समाजात जणू काही रूढच होत आहे. असो...! मंगळाविषयी थोडक्यात सांगतो. मंगळ हा लाल तांबूस रंगाचा असून त्यास भूमिपुत्र, अंगारक, रूधीर, वक्र, क्षितीज, भौम, कुज, यम ईत्यादी संबोधतात. तंत्रज्ञ आणि यंत्रज्ञ उद्याग हे मंगळ अधिपत्यखाली येतात. मंगळ कुमार आहे आणि सळसळत्या रक्तात, सैन्यात आणि सेनापतीपदाचा कारक हाच तर ग्रह आहे. जिथे शक्ती आहे तेथे मंगळ आहे. मंगळ हा मंगलकारक आहे, म्हणूनच सौभाग्यस्त्रिया गळ्यात घालतात ते “मंगळसूत्र” असते. मंगळवारी येणाऱ्या चतुर्थीस “अंगारिका चतुर्थी” म्हणतात. मंगळवारी येणाऱ्या त्रयोदशीला “भौम प्रदोष” म्हणतात. पतीबरोबर एकत्र राहण्यासाठी केली जाणारी सप्तपदीस “मंगळ फेरे” म्हणतात.  मंगळचा रक्त लाल व सौ-लेणे म्हणून स्त्रिया कापळी कुंकू लावतात ते लाल रंगाचे, मंगळसूत्रात दोन-दोन पोवळे हे मंगळाचे प्रतीकच घातलेले असतात. मंगळसूत्रातील काळेमणी म्हणजे शनीचे आणि कपाळावरील कुंक लाल रंगाचे हे पाहिल्यावर परपुरुषाचे त्या स्त्रीकडे वाकड्या नजरेने पाहण्याचे धाडस होत नाही. तर मंगळ हा मंगलकारीच आहे. तो अमंगल असेलच कसा.....!!

येथे मला पत्रिकेतील मंगळदोष हा विषय मांडण्यास संगीतला आहे त्यामुळे आपण मंगळदोषचा विचार करणार आहोत. पत्रिका पाहुन विवाह करावा की नाही हा ज्याचा त्याचा व्यक्तीक प्रश्न आहे. मात्र, सद्या पत्रिका पाहून विवाहाचा कल वाढत आहे.  वधू पित्याने किंवा वरच्या पित्याने दिलेल्या ठोकळा कुंडलीवरून पत्रिकामेलन बाबतील विचार करणे एवढाच असतो. बरे दिलेले टीपण किती बरोबर आहे ? कुणी जाणकार व्यक्तीने बनविले आहे का ? याचे उत्तर हे पालकाकडून नाकार्थीच येते कारण पत्रिकेची आठवण ही आपल्या मुला-मुलीच्या लग्नाच्या वेळीच येत असते. त्यात त्या पत्रिकेची स्थिती कशी झाली असावी हे सांगणे नको. त्यातच हल्ली मी जो अनुभव घेत आहे तो Android Apps  गुणमिलन करतात आणि चुकीच्या संकल्पना मनात बाळगतात. त्यात चुका आढळतात.  बरेचदा ही कुंडली कोण तपासतो ? कळो अगर न कळो बाळू पासून बाबा तर ताई पासून आई आणि मामा पासून मावशी असे बरेचजन हाताळताना दिसतात. १, ४, ७, ८, १२ या स्थानत मंगळ असल्यास ती मांगळीक पत्रिका असे त्यांनी एकेवलेले असते किंवा पंचागात वाचलेले असते. त्यामुळे यास्थानी मंगळ दिसलारे दिसला की मंगळाची पत्रिका म्हुणून शिक्का मोर्तब करतात. परिणामी मंगळाची पत्रिका सखोल अभ्यास न करता नकार कळविला जोतो.

विवाहासाठी  वधु-वरच्या पत्रिका जुळावीताना नाडी, भूकुट, गण वगैरे ८ प्रकारातून गुण पाहतात. १८ वा त्यापेक्षा जास्त गुण येत असल्याने पत्रिका जुळते असे सांगण्याचे प्रमाण जास्त आढळते. ३६ गुण जमत असूनही संसार सुखाचा होत नाही आणि अगदी कमी गुण असूनही संसार छान होतो असेही मत आढळते. जास्त खोलात जाऊन पत्रिकेला अभ्यास करण्याऱ्या ज्योतिषांचे प्रमाण फारच कमी आहे. तज्ञ जाणकार हा केवळ ठोकला कुंडलीवरून विचार करत नाही तर जन्मलग्न, भावचलित, आणि नवमांश, ईत्यादी कुंडल्यावरून विचार करेल.


वस्तीविक या मंगळाला नियमापेक्षा अपवाद जास्त आहे, ते न पाहता मंगळाची कुंडली नाकारली जाते. तसे होऊ नये म्हणून मंगळचा दोष नाहीसा करणाऱ्या पुढील तथ्य बाबी आपण पाहूया:
१) मंगळ कुठल्याही स्थानात निच राशीचा म्हणजे कर्क राशीचा असता.
२) मंगळ शत्रू राशीत म्हणजे मिथून, कन्या वा बुधाच्या राशीचा असता.
३) मंगळ अस्तंगत म्हणजे रवीचे जवळ ७ अंश असता.
४) मंगळ प्रथम स्थानी मेषेचा, चतुर्थस्थानी वृश्चिकेचा, सप्तमात मकरेचा, अष्ठमात सिंहेचा, व द्वादश स्थानात धनु राशीचा असता दोष नाहीसा होतो.
५) मंगळवार शुभ ग्रहांची दृष्टी असता तो सौम्य होतो.
६) मंगळ-लग्न, चंद्र किंवा शुक्रापासून १ ल्या स्थानात असेल आणि त्यास्थानाची राशी मेष, कर्क, वृश्चिक असेल तर मंगळदोष नाही.
७) मंगळ-चंद्र एकाच राशीत असता मंगळदोष नाही. (हा योग शुभ आहे).
८) पंचमात किंवा दशमात शनी असता, शनी दृष्टी ही सप्तमभावार (पती/पत्नी स्थान) असते, शनीचा दाब या स्थानवर असतो. त्यामुळे मंगळदोष राहत नाही.
९) लग्नी अगर सप्तमात गुरु असता, शुक्र असता, मंगळदोष मानू नये.
१०) विवाहात दुसरा अडसर बाब – एक नाड दोष / एक नाडीत जर चरण भिन्न असतील तर एकनाड मानू नये.

वरील काही महत्वाच्या बाबतीत मंगळदोष नाहीसा होतो. आजूनही यात काही योग दृष्टी यांच्यामुळे देखिल हा दोष नाहिसा होतो यासाठी तज्ञ ज्योतीषाचा सल्ला हा मार्गदर्शकच ठरेल. केवळ मंगळ आणि गुण न पाहता जातकास पुढील येणाऱ्या दशा पहा, त्याचे आयुष्यमान, आरोग्य, धन, भरभराट, मानसन्मान याकडे जास्त लक्ष द्यावे. त्यामुळे मंगळची भीती मनातून काढून टाकावी आणि आपल्या मुला-मुलीच्या जोडीदाराची योग्य निवड करावी हेच फार महत्ताचे नाही का...!!
Preview
* लेखाचे सर्व हक्क लेखक - दिपक पिंपळे यांचे

!! शुभम् भवतु !!