शुक्रवार, २८ जून, २०१३

"कर्मयोग"


श्री स्वामी समर्थ 
सर्व गुरु बंधू आणि गुरु भगिनीनो, सादर प्रणाम 

काल आपण प्रारब्ध हा विषय हाताळायचा प्रयत्न केला. आज कर्मयोग आणि त्याचे प्रारब्धाशी असेलेले अतूट नाते समजून घ्यायचा प्रयत्न करू या. 

विषयाला हात घालण्यापूर्वी, कर्म आणि कर्मयोग म्हणजे काय हे पहावे लागेल.(प्रारब्ध म्हणजे काय हे कालच पाहिले आहे.). 

कर्म:आपण जी दैनंदिन कामे (स्वतः साठी आणि दुसऱ्या साठी) करतो ती सर्व कर्म ह्या गटात मोडतात. ही कर्मे बरीच प्रकारची असू शकतात, एक तर स्वेच्छेने केलेली आणि अनिच्छेने केलेली अशी त्यांची वर्गवारी करता येईल. आणि खोलात गेल्यास, काल बघितल्याप्रमाणे, देहकर्म, व्यवसायकर्म, कर्तव्यकर्म, धर्मकर्म आणि अध्यात्मकर्म असे त्याचे पोटभाग करता येतील. आता, फळाची अपेक्षा न धरता कर्म करा असे परमार्थ सांगतो, 
पण खरेच ते माझ्यासारख्या सामान्य भक्ताला शक्य आहे का? उत्तर आहे, हो पण आणि नाही पण. त्याचे स्पष्टीकरण म्हणजे, आपण करत असलेली काही कर्मे आपण निश्चितच काही अपेक्षा न ठेवता करू शकतो. उदाहरणार्थ, आईवडीलांची सेवा, मुलांचे संगोपन इत्यादी. ह्यात प्रकर्षाने स्वामी नामस्मरण लिहिणे टाळतो आहे कारण बहुतौशी नामस्मरण हे अपेक्षा ठेऊनच केले जाते. वरवर आपली स्वामीभक्ती हे त्याचे मुख्य कारण असते ह्यात वाद नाही, पण मनात एक सुप्त अपेक्षा असते की मी एवढे स्वामी नामस्मरण करतो मग मला स्वामी त्याचे उचित फळ देवोत. आणि ते मिळाले नाही आणि संकटाचा डोलारा वाढत गेला की विश्वास डगमगू लागतो. स्वामी का माझ्याकडे लक्ष देत नाहीत, का माझी ह्यातून सुटका होत नाही, असा विचार करून मन खट्टू होते. "महाराजा! काय रे पाप केले मी,,, जे तू मला हे दिवस दाखवतो आहेस?" असे विचार येतात. ह्या सर्वांचे मूळ नामस्मरणामागची सुप्त अपेक्षाच असते. माझ्यासारखा भक्त हे चारचौघात कबुल करणार नाही पण माझे सत्य मी माझ्यापासून लपवून ठेऊ शकत नाही. 

असो! तर काही कर्मे पूर्णपणे अपेक्षारहित असू शकतात आणि काही अपेक्षापूर्ण. आणि त्यात गैर असे काही नाही. काल सांगितल्याप्रमाणे व्यवसायकर्म (नौकरी) करताना पगाराची अपेक्षा नाही ठेवली तर उपाशी मरायची पाळी येईल. देहकर्म, व्यायाम करताना, शरीर निरोगी राहिले पाहिजे ही अपेक्षा असणे चुकीचे नाही. पण उरलेली तीन कर्मे नक्कीच अपेक्षाविरहित असू शकतात किंवा तसा प्रयत्न करण्यास काहीच हरकत नाही. 

जेव्हा फळाची अपेक्षा ठेवून कर्म केले जाते तेव्हा साधकाचे लक्ष आपल्या कर्मापेक्षा त्याच्या फळाकडे होणाऱ्या प्रगतीकडे वा त्या फळाच्या परिणामाकडे द्विगुणीत होत. ह्याचे दुष्परिणाम दोन. एक म्हणजे तो आपल्या प्रयत्नात कधीही पूर्णपणे एकरूप होवू शकत नाही आणि दुसरे म्हणजे दुष्परिणामाची चिंता त्याला आपल्या कर्मापासून मागे खेचते. मनाची ओढाताण होते. 

महाभारतात गीता सांगण्याचे निमित्त हेच आहे. अर्जुनाला "आपण, आपल्या आप्तांची हत्या कशी करावी? मला पाप लागेल?" अशी चिंता भेडसावू लागली आणि त्याचे पर्यावसान त्याने आपले गांडीव जमिनीवर ठेवण्यात झाले. आता विचार केल्यास लक्षात येईल की अर्जुन हा, आपण आपल्या आप्तांची हत्या केली तर होणाऱ्या दुष्परिणामाचा (फळाचा) विचार करत होता. फळाची/प्रारब्धाची जबाबदारी स्वतःकडे घेत होता आणि त्यामुळे त्याची भरकट झाली. भगवंतांनी त्याला समजावले की "बाबा रे! युद्धभूमीत तुझ्यासमोर जो आहे तो तुझा शत्रू आहे आणि त्याला पराभूत करणे हे तुझे कर्म आहे. त्यांचा वध केल्यावर काय होईल हा विचार करणे तुझे काम नाही.तर तू तुझे काम कर आणि बाकीचे माझ्यावर सोड." आणि ह्याच्यातुन आपल्या धर्मग्रंथाचा जन्म झाला.

कर्मयोग: हा शब्द वाचायला मोठा भारदस्त वैगरे वाटतो पण तसे काही नाही. ह्याची सोप्पी व्याख्या समजावून घेऊ. ज्या कर्मामुळे आपल्या जीवाचा आपल्या आत्म्याशी योग/ओळख होण्यास मदत होते त्या कर्मास कर्मयोग म्हणतात. मी कर्ता आहे ह्या भावनेला तिलांजली देणे ह्यास श्रेयस उपासनेत कर्मयोग म्हटले आहे. एखादी गोष्ट मी केली किंवा माझ्यामुळे झाली असा विचार केल्यास,अहंकार वाढीस लागतो हे आपण अगोदरच अभ्यासिले आहे.पण त्याही पुढे जावून असे म्हणावे लागेल की ह्यातून स्पर्धा, मत्सर, घृणा असे विकार जन्माला येतात आणि आपल्याला शांत बसू देत नाहीत.त्यामुळे जे घडले ते प्रारब्ध आणि जे माझ्याकडून घडले त्यात मी फक्त निमित्त...... असे हे सोप्पे प्रमेय आहे. 

प्रारब्ध नावाचे एक पूर्ण शास्त्र आध्यात्मात आहे. मोठे रंजक आहे. अर्थात आता त्याची चर्चा नको. पण त्यातील एक नियम मात्र सांगतो. प्रारब्धशास्त्रानुसार, नेहेमी एक जीव दुसऱ्या जीवाला त्याच्या कर्माची फळे द्यायला निमित्त होतो. आणि ही फळे जर मृत्यूसारखी भयानक असतील तर प्रसंगी निसर्ग हस्तक्षेप करतो.... ह्याचा अर्थ काय?

माझ्या पूर्वसुकृत कर्माचे फळ म्हणून मला सर्पदंश होणार असेल, तर मला, काळ त्या सर्पाजवळ घेऊन जाणारच आणि तिथॆ गेल्यावर आजूबाजूच्या ५० लोकाना सोडून सर्प मला चावणारच. दुसरे उदाहरण घेऊ. असे किती लोक असतील जे उत्तराखंडात जायची इच्छा धरून असतील पण ह्या वर्षी त्यांना ते जमल नसेल. ज्यांना जमले ते त्यांचे प्रारब्ध आणि त्यातूनही जे वाचले हे ही त्यांचे प्रारब्धच. इकडे फळ देण्यासाठी निसर्गाचा हस्तक्षेप आहे. 
कर्मयोगात कर्तेपण ईश्वराकडे सोपवण्यावर खूप भर दिला आहे. म्हणून भगवान श्री कृष्णानी अर्जुनाला गीतेत सांगितले "निमित्तमात्रं भव सव्यसचिन"

आता प्रश्न असे पडतात की ही सर्व (प्रारब्धाची) व्यवस्था कोणी केली? त्यावर नियंत्रण कोणाचे? ती शक्ती मूर्त आहे का अमूर्त?आपल्या सर्वांना माहित आहे की ही भगवंताची लीला आहे. भगवंत नावाचे अमूर्त (निर्गुण) तत्व हे प्रारब्धाचे निर्माणकर्ते आणि नियंत आहे असे श्रेयस उपासना शिकवते. पण तो भगवंत जर निर्गुण आहे म्हणजे त्याला भौतिक अस्तित्व नाही त्यामुळे तो दिसत नाही आणि मग इथे आमचे परिवर्तनवादी मित्र किंवा शास्त्रज्ञ चेकाळतात. देव आहे का नाही असे वाद संवाद निर्माण होतात. "अरे माणूस चंद्रावर जावून पोहोचला अजूनही तुम्ही त्या चंद्राला तुमच्या पत्रिकेतून बाहेर काढत नाही, कसला आध्यात्म आणि कसला परमार्थ?" असे प्रश्न ही लोक मोठ्या अभिमानाने विचारतात. 

विज्ञानाने अचाट प्रगती केली ह्यात वाद नाही. पण काही गोष्टी विज्ञान अजूनही स्पष्ट करू शकत नाही. 

१) विज्ञानाने आजपर्यंत एका तांदुळाच्या अनेक जाती आणि प्रकार निर्माण केले पण ते तांदुळाचे मूळ बीज मात्र विज्ञान अजून बनवू शकले नाही
२) माणसाच्या jenes मध्ये प्रगती/हस्तक्षेप करून ठराविक स्वभावाची माणसे जन्माला घालणे आता विज्ञानामुळे सहज शक्य आहे, पण मूळात मानवाचा जन्म होण्यासाठी लागणारे पुबीज आणि स्त्रीबीज अजून विज्ञान बनवू शकले नाही 
३) आजकाल शरीरातील अवयवांची अदलाबदली (transplant ) ही फार मोठी बाब राहिलेली नाही. पण म्हणून विज्ञान अजून, स्वतंत्र असा मानवाचा कोणताही अवयव प्रयोगशाळेत बनवण्यात यशस्वी झालेले नाही.

असे बरेच प्रश्न आहेत आणि ह्याची उत्तरे शोधताना आपली बुद्धी थकून जाते, कुंठीत होते, लक्षात ठेवा जेव्हा बुद्धी थकून जाते त्याच्यापुढचा सगळा प्रांत हा श्रद्धेचा असतो. आणि हीच निष्काम उपासना. 

ज्ञानेश्वर माउलीचा एक अप्रतिम अभंग सांगून इथे थांबूया 

'तैसे आपुले विहिता, उपायो असे न विसंबिता
ऐसा कीजे की जगन्नाथा, आभारु पडे

म्हणजे,, आपल्या कडून अपेक्षित असलेले कर्म इतक्या उत्तमरित्या करावे की त्या कर्माच्या उपकाराचे ओझे भगवंताच्या मस्तकावर चढावे. काय दिव्य कल्पना आहे ही.......................

लेख सौजन्य : राहुल पिकळे

शनिवार, २२ जून, २०१३

"प्रारब्ध"


श्री स्वामी समर्थ 

आपण आज विषय समजावून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत आणि तो विषय म्हणजे "प्रारब्ध" 
आता बघुया..........श्रेयस उपासना प्रारब्धाबद्दल काय म्हणते? काय शिकवते? जे काही मी अभ्यासायचा प्रयत्न केला तो मांडतोय 

शास्त्रज्ञ/वैज्ञानिक, हे प्रारब्ध शब्द ऐकला की फार चिडतात. जणू ह्या शब्दाशी त्यांचे जन्मोजन्मांतरीचे वैर असावे. कारण विज्ञान, प्रारब्ध मानत नाही आणि आध्यात्म प्रारब्धाखेरीज दुसरे काही मानत नाही. विज्ञानाने प्रारब्धाला Destiny /predestination किंवा Fate अशी नाव देवून त्याला निकालात काढले, त्यांच्या मते, नैराश्य, नाकर्तेपणा, आपला कमकुवतपणा वैगरे लपवण्याचे एक ठिगळ म्हणजे प्रारब्ध, पण आध्यात्मात प्रारब्धाला खूप महत्व आहे. आपल्या व्यावहारिक भाषेत आपण त्याला नशीब, भोग, काळ, अश्या वेगवेगळ्या नावाने ओळखतो. विज्ञान आणि आध्यात्मातला हा वाद, आध्यात्म कसा संपवतो ते नंतर तपासू. आता मुद्याला येऊ..........

"जर ५ मिनिटे उशीर झाला असता, तर मी तुला दिसलो नसतो", "काय नशीब बघ, ही संधी, जणू मी येण्याची वाटच बघत होती", "अरे आणि काय करू सांग, साला! माझ नशीबच फुटक", "काय कराव सुचत नाही? काय नशिबात लिहून ठेवलय, त्या देवासच ठाऊक?" " मरू दे! तू आणि तुझ नशीब, जे नशिबात लिहिले आहे तेच होईल" अशी आणि ह्या अर्थाची बरीच वाक्ये आपण आसपास ऐकतो किंवा प्रसंगी स्वतःही वापरतो. ही आणि अशी सर्व वाक्ये ही "प्रारब्ध" ह्या तत्वाकडे बोट दाखवतात.

"अवघियांचे अवघे सजे, तरी अवघे होती राजे " असे दासबोधात समर्थांनी लिहिले आहे. ह्याचा अर्थ जर सगळ्यांच्या सगळ्या इच्छा/मनीषा पूर्ण झाल्या असत्या तर सगळेच राजे झाले असते. पण तसे होत नाही. असा एकही माणूस भेटत नाही ज्याने जो विचार केला, ठरवले अगदी तसेच आणी तसेच झाले. हेच प्रारब्ध..............

प्रारब्ध समजून घ्यायचे असेल तर थोडे कर्माबद्दल समजून घ्यावे लागेल. आणि ते खालील प्रमाणे.

आपण रोजच्या आयुष्यात जी जी कामे करतो, चांगली वाईट त्यासर्व कामाना/क्रियेला कर्म म्हणतात हे आपल्याला सर्वाना माहित आहेच . आता ही कर्मे मूलतः तीन प्रकारात येतात.

१) संचित कर्म : आपण गेल्या अनेक जन्मात केलेली अनेक चांगली वाईट कर्मे ह्या कर्मात मोडतात.
२) प्रारब्ध कर्म : आपण पूर्वजन्मी केलेल्या आणि ह्या जन्मी करतोय ती सर्व ह्यात येतात. थोडक्यात कर्माच्या संचितात आपण सद्य परिस्थितीत जी भर घालतो ते प्रारब्ध कर्म. 
३) आगामी कर्म : जी कर्मे आपण आज करतो आहोत ज्याचे फळ आपणास भविष्यात मिळणार आहे ती सर्व कर्म ह्या भागात येतात. 

एक विसरू नका, मानव जन्म मिळणे हेच एका बलदंड संचित कर्माचे प्रतिक आहे. आणि हा जन्म खरोखरच अनमोल आहे कारण त्यामुळे आपणास स्वामिसेवा करण्याचे भाग्य लाभले. अर्थात आपण करत असलेली स्वामिसेवा हे आपल्या आगामी कर्मात येत. 

आता हे समजल्यावर, आणि थोडे खोलात जावू, ढोबळ मानाने आपण सध्या करत असलेल्या कर्मांचा विचार केल्यास त्यांचेही ३ प्रकार करता येतील 

१) इच्छा : ह्या कर्मात, आपण स्वतःच्या मर्जीने/आवडीने हे कर्म करतो. 
२) अनिच्छा: ह्यात आपण स्वतःच्या मर्जीने किंवा संमतीने हे कर्म करत नाही. नाइलाजाने, जबरदस्तीने, कंटाळून केलेले कर्म ह्यात येतात.
३) परेच्छा : ह्यातील कर्म आपण दुसऱ्याच्या इच्छेने करतो. कदाचित दुसरे खुश व्हावे म्हणून, दुसरे काय म्हणतील म्हणून, केलेली कर्मे ह्यात येतात. 

अजून थोडे खोलात गेल्यावर आपल्याला कर्म करण्याची आपली माध्यमेसुद्धा कळतील,
१) मानसा 
२) वाचा 
३) कर्मणा 
पण त्याची चर्चा पुन्हा कधीतरी

आपल्या व्यावहारिक भाषेत सांगायचे झाले तर देह्कर्म, व्यवसायकर्म, कर्तव्यकर्म, धर्मकर्म आणि आध्यात्मकर्म असे कर्माचे भाग करता येतील. कर्म करताना त्याच्या फळाविषयी विचार येणे अगदी नैसर्गिक आहे, पण तोच विचार बाजूला ठेऊन अपार प्रयत्न करून आपले कर्म पार पाडावे असे आध्यात्म सांगते. फळावर नजर ठेऊन केलेले कर्म हे कधीही कर्मनिष्ठ होवू शकत नाही. 
आजकालच्या जगामध्ये हे पूर्णपणे शक्य नाही, म्हणजे व्यवसाय कर्मात फळाची (पगार, प्रमोशन, आर्थिक फायदा) ह्याचा सारासार विचार करावाच लागतो, पण हे सर्व प्रकारच्या कर्मांना लागू नाही.
आपण स्वामींचा जप करतो, का करतो हे प्रत्येकाने स्वतःला विचारावे, उत्तर मिळेल. म्हणून संकटात असताना जप केला आणि परिस्थिती सुधारली नाही की विश्वास डगमगायला लागतो, मन खट्टू होते, त्याचे हेच कारण. की आपण स्वामीभक्त, आपल्या संकटकाळी आपण त्यांची आराधना केली म्हणजे त्यांनी माझी त्वरीत त्यातून सुटका केली पाहिजे हे फळ त्या नामस्मरणातून अपेक्षित असते. पण ही अपेक्षाच (फळ) नसेल तर अशी परिस्थितीच उद्भवणार नाही. आणि निष्काम भक्ती करता येईल.

आपण केलेल्या ह्या वेगवेगळ्या कर्मांची फळ आपल्या संचितात जमा होत असतात आणि त्याच्या परिणामाला प्रारब्ध असे म्हणतात. हे कोणालाही चुकत नाही आणि कोणाही ते चुकवू शकत नाही . असे म्हणतात की वेगवेगळ्या ९९ योनीतून (जन्मातून) गेल्यावर जीवात्म्याला मनुष्य जन्म मिळतो. आणि त्या जन्मानंतर दोन वाटा असतात एक मोक्षाची आणि एक परत जन्ममृत्युच्या फेऱ्यात परत अडकायची.............

आता असे म्हटल्यावर, काही प्रश्न मनात येतात, 

जर माझे प्रारब्ध अगोदरच ठरले आहे तर मग माझ्या हातात काय उरते? 
जर हे सगळे पूर्वनियोजित आहे तर मी कशाला कसले प्रयत्न करायचे? जे होणार ते होणारच. "असेल माझा हरी, तर देईल मला खाटल्यावरी" असे विचारही थैमान घालतात. 

जर वरचा मजकूर नीट अभ्यासला तर लक्षात येईल की जे होते आहे ते आपल्या पूर्वकर्माचे फळ आहे आणि त्यापुढे जे होणार आहे ते माझ्या आजच्या कर्माचे फळ असणार आहे. मग आज मला हातावर हात घेऊन बसणे कसे चालेल?

आपल्या संचितात जमा झालेली नासकी फळे ही आपल्याला, चांगली कर्मे करून कमी करता येतात. म्हणून मानवाला देव ओळखण्याचे/भजण्याचे अचाट सामर्थ्य भगवंताने दिले आहे. त्याचा पुरेपूर फायदा घेऊन आपले संचित शुध्द करणे हे ज्याच्यात्याच्या हातात असते. 

आता प्रारब्धावर विश्वास न ठेवणाऱ्या परिवर्तनवादी वैज्ञानिकांबद्दल थोडेसे बोलू या. त्यांचे असे मत असते की जे काही घडते आणि घडणार आहे आणि जे घडून गेले, त्याला ठराविक असा शास्त्रीय प्रमाद किंवा कारण असते. उदाहरणे घेऊन, आध्यात्म ह्या वादाला कसे झुकवतो ते पाहुया 


१) सध्या उत्तराखंडात किती माणसे दगावली हे सर्वांना ज्ञात आहेच. आता ही माणसे का दगावली? तर पूर आला म्हणून, मग पूर का आला?तर पावसाळा आहे, थोडा हवामानात बदल झाला इत्यादी, इत्यादी आणि पूर आला. पाण्याची पातळी एवढी वाढली आणि त्यात माणसे वाहून गेली किंवा दगावली. अशी कारणे कोणताही २० व्या शतकातील शास्त्रज्ञ देईल. पण मग ह्यावर फक्त दोनच प्रश्न, १) पूर उत्तराखंडातच का आला? २) आणि फक्त एवढीच माणसे का दगावली, बरीच माणसे ह्यातून वाचली सुद्धा? मग असे का? उत्तर एकच ................................. प्रारब्ध 
२) एड्स हा महाभयंकर रोग आज सर्व जगात थैमान घालतोय. हा एड्स माकडातून आला असे म्हणतात. मग माकडे हे तर आपले पूर्वज, त्यांच्यात आत्ताच तो रोग कुठून उत्पन्न झाला? आणि जर अगोदरपासून असेल तर आताच २० व्या शतकात का पसरला? उत्तर एकच ................................... प्रारब्ध 
३) एकाच आईच्या पोटी आलेली मुले/ भावंडे अतिशय भिन्न स्वभावाची निघतात, तर विज्ञान म्हणते, त्यांच्या जन्माच्या वेळी असेलेले त्यांचे metabolism ह्यास कारणीभूत असते. मग असे असेल तर जुळ्या मुलांच्या बाबतीतही असे का होते? उत्तर एकच...................................... प्रारब्ध 

म्हणून संत तुकाराम महाराज म्हणतात 
जैशी स्थिती आहे, तैश्यापारी राहे 
कौतुक तू पाहे संचिताचे 

तर समर्थ रामदास स्वामी सुचवतात 

काही गलबला, काही निव्वळ 
असा कंठीत जावा काळ 

लेख सौजन्य : श्री राहुल पिकळे 

बुधवार, १९ जून, २०१३

” हम गया नही, जिंदा है “

"अक्कलकोट पुण्यभूमी थोर जेथे प्रत्यक्ष दत्त वसे”

इसवी सन 1856 मध्ये स्वामी महाराजांनी अक्कलकोट प्रवेश केला.व तेथल्या बावीस वर्षांच्या वास्तव्यात सर्व विश्वाला दैदिप्यमान असे तीर्थक्षेत्र अक्कलकोट करून जगातील अनेक मान्यवरांना मार्गदर्शन केले.‘चैतन्य स्वामी’ हे त्यांचे मुळ नाव . हिमालयात वास्तव्य ,सर्व भारतभर भ्रमण ‘.चंचल भारती‘ हे नाव हि द्रुतगतीच्या प्रवासामुळे लाभले असावे , मग ‘दिगंबर बुवा’, मग अक्कलकोटचे स्वामी ,’ श्री स्वामी समर्थ’ हेच नाव , जे आज एक स्वयंभू मंत्र झाले आहे.

स्वामींचे वर्णनविशेष

स्वामींचे वर्णनविशेष म्हणजे ते दाशरथी रामाप्रमाणे आजानुबाहू होते . उंची सहा फुटांपेक्षा जास्त , विशाल छाती ,रुंद खांदे ,उगवत्या सूर्याप्रमाणे बालरवी,अरुणाप्रमाणे तेज:पुंज भगवी कांती ,तर चरणकमलांची नाजूकता कमलदलाप्रमाणे मृदुल, चंद्रबिम्बाशी स्पर्धा करणारे तेजोवलय चरणांच्या भोवती , करारीपणा दाखविणारी नासिका , कर्ण श्री गजाननाप्रमाणे व त्यात डुलणारी शोभिवंत कुंडले , दृष्टी अत्यंत भेदक. परंतु , भेदक दृष्टी च्या पलीकडे गेलात कि, मूर्तिमंत वासल्य ओसंडताना दिसते . रौद्र मुद्रेच्या पलीकडे प्रसन्न मुद्रा दिसेल.

स्वामी स्वत: संबधी फारसे बोलत नसत …काही मंडळी एकत्र आली असता एका गृहस्थाने स्वामिना विचारले ,”आपण कोण?” स्वामिनी उत्तर दिले-”दत्तनगर,मुळ पुरुष – वडाचे झाड-मूळ मूळ “

तरीपण अधिक खुलासा व्हावा म्हणून एका गृहस्थाने प्रश्न केला ,“स्वामी आपले गोत्र काय?” स्वामी म्हणाले ” .आम्ही यजुव्रेदि ब्राह्मण,नाव नृसिंहभान ,कश्यप गोत्र, मीन लग्नरास, पुन्हा विचारल्यास टाळक्यात पायपोस“

सूत्ररूपाने बोलत .’दत्तनगर ‘ म्हणजे दत्ताने दिलेले किवा दत्ताच्या ठिकाणाहून आलेले ,’मूळ पुरुष’म्हणजे आदिपुरुष म्हणजेच साक्षीस्वरूप परमात्मा . ‘वडाचे झाड म्हणजे मूळ परमात्म शक्तीपासून जीवांचे असेच खाली खाली अवतरण होत अस्तेख़लि अवतीर्ण झालेल्या जीवांची मुळे हि वर असतात वडाच्या वृक्षापासून पारंब्या खाली खाली येतात निर्गुणातून सगुणात येताना किवा अव्यक्तातून व्य्क्तात येतान,वरून खाली हाच क्रम असतो ,तोच ‘वडाचे झाड ‘ या शब्दाने सुचित केला आहे. मूळ मूळ म्हणजे मुल किवा आद्य प्रकृती योगमाया असा आहे ।आत्म मायेच्या रूपाने मी पुन:पुन्हा संभवतो असे भगवंताचे म्हणणे आहे.

स्वामी समर्थ क्षणात अंतर्धान पावत व अचानक प्रगट होत. स्वामी गिरनार पर्वतावर गुप्त झाले व क्षणात आंबेजोगाई येथे प्रगट झाले. हरिद्वारहून काठेवाडातील जिविक क्षेत्रातील नारायण सरोवराच्या मध्यभागी सहजासन घालून बसलेले दिसले. नंतर पंढरपुरातील भीमा नदीच्या भर पुरातून चालत जाताना भक्तांनी पहिले.

“स्वामीना तूळस, भगव्या रंगाची फुले आवडत असे स्वामी सूत सांगतात ;ते एके ठिकाणी म्हणतात ::
” परी हो स्वामीसी आवडे भगवे फूल !
भगव्या फुलाची माळ ती सगुन !करोनिया तुम्ही चरणी अर्पा !!



श्री स्वामी समर्थ

श्री स्वामी समर्थाना खाण्याच्या पदार्थात “बेसनाचे लाडू “,”पूरण पोळी” ,कड्बोळी व “कांद्याची भजी” त्याना विशेष अ!वडत असे.
स्वामी कुत्रा, गायीवर खुप प्रेम करत असत…!!

इसवी सन १८५६मध्ये स्वामी महाराजांनी अक्कलकोट गावात प्रवेश केला व तेथे पुढची बावीस वर्षे वास्तव्य केले. त्यांच्या अक्कलकोट येथे राहण्यामुळे अक्कलकोट हे गाव सर्व विश्वाला देदीप्यमान असे तीर्थक्षेत्र समजले जाऊ लागले. येथे राहून स्वामी समर्थांनी जगातील अनेक मान्यवरांना मार्गदर्शन केले. आणि इसवी सन १८७८मध्ये1 आपला अवतार संपवला. आपल्या पार्थिव देहाचा त्याग केला असला तरी ”हम गया नही, जिंदा है l ” हे त्यांचे वचन भक्तांना आधार आहे. ज्या ज्या वेळी त्यांचे स्मरण केले जाते, त्या त्या वेळी श्री स्वामी समर्थ आपणापाशीच असतात, हे निश्चित. परंतू प्रत्यक्षात स्वामी महाराज आज 2009 मध्ये देखील भक्तांच्या पाठीशी सतत राहून त्यांना मार्गदर्शन करून कार्यरत करीत आहेत व अनंतकाळ पर्यंत करीत राहतील.


फोटो व लेख सौजन्य: श्री प्रशांतजी कुडाळकर 

सोमवार, १० जून, २०१३

क्रिकेटचा बादशाह - सचिन तेंडूळकर

|| श्री स्वामी समर्थ ||
नमस्कार,

आज क्रिकेटच्या दुनियेचा बादशाह सचिनची कुंडली आपल्या समोर मांडत आहे. के. पी. पद्धतीने व ४-स्टेप थेरीचे नियम या कुंडलीत चपखल बसतात, हे अभ्यासनीय आहे. आमच्या एका जोतिष मित्राची विनंती ही बऱ्याच दिवसापासून आमच्याकडे पेंडिंग होती त्यामुळे हा लेख त्यास समर्पित.
  







आपला, 
Preview