शनिवार, २२ जून, २०१३

"प्रारब्ध"


श्री स्वामी समर्थ 

आपण आज विषय समजावून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत आणि तो विषय म्हणजे "प्रारब्ध" 
आता बघुया..........श्रेयस उपासना प्रारब्धाबद्दल काय म्हणते? काय शिकवते? जे काही मी अभ्यासायचा प्रयत्न केला तो मांडतोय 

शास्त्रज्ञ/वैज्ञानिक, हे प्रारब्ध शब्द ऐकला की फार चिडतात. जणू ह्या शब्दाशी त्यांचे जन्मोजन्मांतरीचे वैर असावे. कारण विज्ञान, प्रारब्ध मानत नाही आणि आध्यात्म प्रारब्धाखेरीज दुसरे काही मानत नाही. विज्ञानाने प्रारब्धाला Destiny /predestination किंवा Fate अशी नाव देवून त्याला निकालात काढले, त्यांच्या मते, नैराश्य, नाकर्तेपणा, आपला कमकुवतपणा वैगरे लपवण्याचे एक ठिगळ म्हणजे प्रारब्ध, पण आध्यात्मात प्रारब्धाला खूप महत्व आहे. आपल्या व्यावहारिक भाषेत आपण त्याला नशीब, भोग, काळ, अश्या वेगवेगळ्या नावाने ओळखतो. विज्ञान आणि आध्यात्मातला हा वाद, आध्यात्म कसा संपवतो ते नंतर तपासू. आता मुद्याला येऊ..........

"जर ५ मिनिटे उशीर झाला असता, तर मी तुला दिसलो नसतो", "काय नशीब बघ, ही संधी, जणू मी येण्याची वाटच बघत होती", "अरे आणि काय करू सांग, साला! माझ नशीबच फुटक", "काय कराव सुचत नाही? काय नशिबात लिहून ठेवलय, त्या देवासच ठाऊक?" " मरू दे! तू आणि तुझ नशीब, जे नशिबात लिहिले आहे तेच होईल" अशी आणि ह्या अर्थाची बरीच वाक्ये आपण आसपास ऐकतो किंवा प्रसंगी स्वतःही वापरतो. ही आणि अशी सर्व वाक्ये ही "प्रारब्ध" ह्या तत्वाकडे बोट दाखवतात.

"अवघियांचे अवघे सजे, तरी अवघे होती राजे " असे दासबोधात समर्थांनी लिहिले आहे. ह्याचा अर्थ जर सगळ्यांच्या सगळ्या इच्छा/मनीषा पूर्ण झाल्या असत्या तर सगळेच राजे झाले असते. पण तसे होत नाही. असा एकही माणूस भेटत नाही ज्याने जो विचार केला, ठरवले अगदी तसेच आणी तसेच झाले. हेच प्रारब्ध..............

प्रारब्ध समजून घ्यायचे असेल तर थोडे कर्माबद्दल समजून घ्यावे लागेल. आणि ते खालील प्रमाणे.

आपण रोजच्या आयुष्यात जी जी कामे करतो, चांगली वाईट त्यासर्व कामाना/क्रियेला कर्म म्हणतात हे आपल्याला सर्वाना माहित आहेच . आता ही कर्मे मूलतः तीन प्रकारात येतात.

१) संचित कर्म : आपण गेल्या अनेक जन्मात केलेली अनेक चांगली वाईट कर्मे ह्या कर्मात मोडतात.
२) प्रारब्ध कर्म : आपण पूर्वजन्मी केलेल्या आणि ह्या जन्मी करतोय ती सर्व ह्यात येतात. थोडक्यात कर्माच्या संचितात आपण सद्य परिस्थितीत जी भर घालतो ते प्रारब्ध कर्म. 
३) आगामी कर्म : जी कर्मे आपण आज करतो आहोत ज्याचे फळ आपणास भविष्यात मिळणार आहे ती सर्व कर्म ह्या भागात येतात. 

एक विसरू नका, मानव जन्म मिळणे हेच एका बलदंड संचित कर्माचे प्रतिक आहे. आणि हा जन्म खरोखरच अनमोल आहे कारण त्यामुळे आपणास स्वामिसेवा करण्याचे भाग्य लाभले. अर्थात आपण करत असलेली स्वामिसेवा हे आपल्या आगामी कर्मात येत. 

आता हे समजल्यावर, आणि थोडे खोलात जावू, ढोबळ मानाने आपण सध्या करत असलेल्या कर्मांचा विचार केल्यास त्यांचेही ३ प्रकार करता येतील 

१) इच्छा : ह्या कर्मात, आपण स्वतःच्या मर्जीने/आवडीने हे कर्म करतो. 
२) अनिच्छा: ह्यात आपण स्वतःच्या मर्जीने किंवा संमतीने हे कर्म करत नाही. नाइलाजाने, जबरदस्तीने, कंटाळून केलेले कर्म ह्यात येतात.
३) परेच्छा : ह्यातील कर्म आपण दुसऱ्याच्या इच्छेने करतो. कदाचित दुसरे खुश व्हावे म्हणून, दुसरे काय म्हणतील म्हणून, केलेली कर्मे ह्यात येतात. 

अजून थोडे खोलात गेल्यावर आपल्याला कर्म करण्याची आपली माध्यमेसुद्धा कळतील,
१) मानसा 
२) वाचा 
३) कर्मणा 
पण त्याची चर्चा पुन्हा कधीतरी

आपल्या व्यावहारिक भाषेत सांगायचे झाले तर देह्कर्म, व्यवसायकर्म, कर्तव्यकर्म, धर्मकर्म आणि आध्यात्मकर्म असे कर्माचे भाग करता येतील. कर्म करताना त्याच्या फळाविषयी विचार येणे अगदी नैसर्गिक आहे, पण तोच विचार बाजूला ठेऊन अपार प्रयत्न करून आपले कर्म पार पाडावे असे आध्यात्म सांगते. फळावर नजर ठेऊन केलेले कर्म हे कधीही कर्मनिष्ठ होवू शकत नाही. 
आजकालच्या जगामध्ये हे पूर्णपणे शक्य नाही, म्हणजे व्यवसाय कर्मात फळाची (पगार, प्रमोशन, आर्थिक फायदा) ह्याचा सारासार विचार करावाच लागतो, पण हे सर्व प्रकारच्या कर्मांना लागू नाही.
आपण स्वामींचा जप करतो, का करतो हे प्रत्येकाने स्वतःला विचारावे, उत्तर मिळेल. म्हणून संकटात असताना जप केला आणि परिस्थिती सुधारली नाही की विश्वास डगमगायला लागतो, मन खट्टू होते, त्याचे हेच कारण. की आपण स्वामीभक्त, आपल्या संकटकाळी आपण त्यांची आराधना केली म्हणजे त्यांनी माझी त्वरीत त्यातून सुटका केली पाहिजे हे फळ त्या नामस्मरणातून अपेक्षित असते. पण ही अपेक्षाच (फळ) नसेल तर अशी परिस्थितीच उद्भवणार नाही. आणि निष्काम भक्ती करता येईल.

आपण केलेल्या ह्या वेगवेगळ्या कर्मांची फळ आपल्या संचितात जमा होत असतात आणि त्याच्या परिणामाला प्रारब्ध असे म्हणतात. हे कोणालाही चुकत नाही आणि कोणाही ते चुकवू शकत नाही . असे म्हणतात की वेगवेगळ्या ९९ योनीतून (जन्मातून) गेल्यावर जीवात्म्याला मनुष्य जन्म मिळतो. आणि त्या जन्मानंतर दोन वाटा असतात एक मोक्षाची आणि एक परत जन्ममृत्युच्या फेऱ्यात परत अडकायची.............

आता असे म्हटल्यावर, काही प्रश्न मनात येतात, 

जर माझे प्रारब्ध अगोदरच ठरले आहे तर मग माझ्या हातात काय उरते? 
जर हे सगळे पूर्वनियोजित आहे तर मी कशाला कसले प्रयत्न करायचे? जे होणार ते होणारच. "असेल माझा हरी, तर देईल मला खाटल्यावरी" असे विचारही थैमान घालतात. 

जर वरचा मजकूर नीट अभ्यासला तर लक्षात येईल की जे होते आहे ते आपल्या पूर्वकर्माचे फळ आहे आणि त्यापुढे जे होणार आहे ते माझ्या आजच्या कर्माचे फळ असणार आहे. मग आज मला हातावर हात घेऊन बसणे कसे चालेल?

आपल्या संचितात जमा झालेली नासकी फळे ही आपल्याला, चांगली कर्मे करून कमी करता येतात. म्हणून मानवाला देव ओळखण्याचे/भजण्याचे अचाट सामर्थ्य भगवंताने दिले आहे. त्याचा पुरेपूर फायदा घेऊन आपले संचित शुध्द करणे हे ज्याच्यात्याच्या हातात असते. 

आता प्रारब्धावर विश्वास न ठेवणाऱ्या परिवर्तनवादी वैज्ञानिकांबद्दल थोडेसे बोलू या. त्यांचे असे मत असते की जे काही घडते आणि घडणार आहे आणि जे घडून गेले, त्याला ठराविक असा शास्त्रीय प्रमाद किंवा कारण असते. उदाहरणे घेऊन, आध्यात्म ह्या वादाला कसे झुकवतो ते पाहुया 


१) सध्या उत्तराखंडात किती माणसे दगावली हे सर्वांना ज्ञात आहेच. आता ही माणसे का दगावली? तर पूर आला म्हणून, मग पूर का आला?तर पावसाळा आहे, थोडा हवामानात बदल झाला इत्यादी, इत्यादी आणि पूर आला. पाण्याची पातळी एवढी वाढली आणि त्यात माणसे वाहून गेली किंवा दगावली. अशी कारणे कोणताही २० व्या शतकातील शास्त्रज्ञ देईल. पण मग ह्यावर फक्त दोनच प्रश्न, १) पूर उत्तराखंडातच का आला? २) आणि फक्त एवढीच माणसे का दगावली, बरीच माणसे ह्यातून वाचली सुद्धा? मग असे का? उत्तर एकच ................................. प्रारब्ध 
२) एड्स हा महाभयंकर रोग आज सर्व जगात थैमान घालतोय. हा एड्स माकडातून आला असे म्हणतात. मग माकडे हे तर आपले पूर्वज, त्यांच्यात आत्ताच तो रोग कुठून उत्पन्न झाला? आणि जर अगोदरपासून असेल तर आताच २० व्या शतकात का पसरला? उत्तर एकच ................................... प्रारब्ध 
३) एकाच आईच्या पोटी आलेली मुले/ भावंडे अतिशय भिन्न स्वभावाची निघतात, तर विज्ञान म्हणते, त्यांच्या जन्माच्या वेळी असेलेले त्यांचे metabolism ह्यास कारणीभूत असते. मग असे असेल तर जुळ्या मुलांच्या बाबतीतही असे का होते? उत्तर एकच...................................... प्रारब्ध 

म्हणून संत तुकाराम महाराज म्हणतात 
जैशी स्थिती आहे, तैश्यापारी राहे 
कौतुक तू पाहे संचिताचे 

तर समर्थ रामदास स्वामी सुचवतात 

काही गलबला, काही निव्वळ 
असा कंठीत जावा काळ 

लेख सौजन्य : श्री राहुल पिकळे 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा